मित्रांनो सध्याच्या काळात भारताच्या रस्ते आणि रेल्वे नेटवर्कला अधिक मजबूत बनवण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. जसे की कोणत्याही विकसित देशाची दळणवळण व्यवस्था त्याच्या आर्थिक वृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असते, तशीच आपल्यासाठी देखील ती अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात रस्ते आणि रेल्वेच्या प्रकल्पांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प अधिक गतीने राबवला जात आहे. राज्यात अनेक नवीन रेल्वे मार्गांची निर्मिती केली जात आहे, तर काही मार्गांची क्षमता देखील वाढवली जात आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-जामनेर रेल्वे मार्गाचा समावेश आहे, जो आता ब्रॉडगेज करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
हा मार्ग पूर्वी मीटरगेज होता, परंतु रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाला गती दिली असून यासाठी सादर करण्यात आलेल्या निविदांमध्ये अशोका बिल्डकॉन कंपनीच्या 568 कोटी 86 लाख रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता या प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे आणि याचे पूर्ण होणे निश्चित होईल.
ब्रिटिश काळात बांधलेला हा 53 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग आता स्थानिक नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या मागणीमुळे ब्रॉडगेज करण्यात येणार आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या पाहता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरतो. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अनेक वर्षांपासून या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला होता, आणि आता त्याला यश मिळाले आहे.
अशोका बिल्डकॉन कंपनीने या प्रकल्पाच्या सिव्हिल कामांची जबाबदारी घेतली आहे, ज्यामध्ये पूल, अंडर ब्रिज, ओव्हर ब्रीज, रस्ते, यार्ड आणि यार्डमधील रस्त्यांचा समावेश आहे. या कामाची मुदत 30 महिन्यांची आहे. काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात रेल्वे ट्रॅक टाकण्याचे, विद्युतीकरणाचे आणि सिग्नल कार्याचे काम सुरू होईल.
हा रेल्वे मार्ग जळगाव जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना देणार असून, स्थानिक जीवनमान सुधारण्यात मदत करेल.