मंडळी रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केल्यापासूनच या उद्योगात मोठे उलथापालथी घडल्या. अनेक जुने ब्रँड्स बाजारातून हद्दपार झाले, तर काही कंपन्यांनी एकमेकांमध्ये विलीनीकरण केले. सध्या या क्षेत्रात केवळ चार प्रमुख खेळाडू शिल्लक आहेत – जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल. यामध्ये जिओने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत आघाडी घेतली आहे.
TRAI अहवाल – जिओ आघाडीवर
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या मार्च २०२५च्या अहवालानुसार, रिलायन्स जिओने २१.७४ लाख नवीन वायरलेस ग्राहक जोडून सर्वाधिक वृद्धी नोंदवली आहे. याच काळात भारती एअरटेलने १२.५० लाख नवीन ग्राहकांची भर घातली, तर व्होडाफोन आयडियाला ५.४१ लाख ग्राहक गमवावे लागले. त्यामुळे व्होडाफोनची ग्राहक संख्या आता २०.५३ कोटींवर आली आहे.
ग्राहकसंख्येत मोठी उडी
मार्च अखेरीस जिओची एकूण ग्राहकसंख्या ४६.९७ कोटींवर पोहोचली आहे. भारती एअरटेल ३८.९८ कोटी ग्राहकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्राहकसंख्येच्या बाबतीत हे दोन्ही ब्रँड्स आघाडीवर आहेत.
ग्रामीण भारतातही वाढ
TRAIच्या अहवालानुसार, एकूण वायरलेस ग्राहकसंख्या फेब्रुवारी २०२५ मध्ये ११६.०३ कोटी होती, जी मार्चमध्ये ११६.३७ कोटींवर पोहोचली. ही मासिक वृद्धी ०.२८% इतकी झाली. शहरी भागातील ग्राहकसंख्या किंचित घसरली असली, तरी ग्रामीण भागात ती ५२.६३ कोटींवरून ५३.११ कोटींवर वाढली आहे, जे जिओसारख्या ब्रँड्ससाठी सकारात्मक संकेत आहेत.
स्पर्धा जिओ आणि एअरटेलमध्येच
TRAIकडून ऑपरेटरनिहाय सविस्तर आकडेवारी देण्यात आली नसली तरी, मागील ट्रेंड पाहता जिओ आणि एअरटेलनेच सर्वाधिक नवीन ग्राहक मिळवले आहेत. दुसरीकडे, आर्थिक अडचणीमुळे व्होडाफोन आयडियाची वाढ मर्यादित राहिली आहे. बीएसएनएलने ५G घोषणा केली असली, तरी नेटवर्क अडचणी आणि ४Gच्या मर्यादांमुळे कंपनी अजूनही स्पर्धेच्या शर्यतीत मागेच आहे.
बीएसएनएलची अडचण कायम
टाटा समूहातील कंपनीशी करारानंतर बीएसएनएलने ५G सेवा सुरू करण्याची घोषणा केली. नवीन सिमकार्ड्स ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात ग्राहकांना अजूनही ४G इंटरनेटमध्येही अडथळे येत आहेत. पुण्यासारख्या शहरांतही नेटवर्क समस्या जाणवतात. जर बीएसएनएलने लवकर उपाययोजना केली नाही, तर अनेक ग्राहक दुसऱ्या नेटवर्ककडे वळू शकतात.