मंडळी जर तुम्ही एटीएम वापरत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. 1 मे 2025 पासून एटीएम व्यवहारांवर होणारा खर्च वाढणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एटीएम व्यवहारासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी ग्राहकांना 23 रुपये द्यावे लागतील. यापूर्वी हे शुल्क 21 रुपये होते.
शुल्क वाढवण्यामागे मुख्य कारण म्हणजे एटीएम सेवा पुरवण्यासाठी लागणाऱ्या खर्चात झालेली वाढ. बँका आणि थर्ड पार्टी एटीएम ऑपरेटर अनेक दिवसांपासून शुल्क वाढवण्याची मागणी करत होते. त्यांनी याबाबत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडे तक्रार केली होती. त्यानंतर NPCI ने यावर शिफारस केली आणि RBI ने ती मान्य केली.
सध्या ग्राहकांना स्वतःच्या बँकेच्या एटीएममधून महिन्याला 5 मोफत व्यवहार करता येतात. इतर बँकांच्या एटीएमचा विचार करता, मेट्रो शहरांमध्ये 3 आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये 5 मोफत व्यवहारांची मर्यादा आहे. या मर्यादांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र या मर्यादा ओलांडल्यास आता प्रत्येक वेळी 23 रुपये शुल्क आकारले जाईल.
या नव्या नियमामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त खर्च पडणार असून व्यवहार करताना अधिक नियोजन गरजेचे ठरणार आहे. त्यामुळे 1 मेपासून होणाऱ्या या बदलाची माहिती लक्षात घेऊन एटीएम वापरणे अधिक शहाणपणाचे ठरेल.